शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

एक संध्याकाळ अशी....

हा माझा मित्रपरिवार....
तुमच्या मनात आलं असेल की ह्या कवितेसोबत मी हा फोटो का टाकला..?
कारण.."एक संध्याकाळ अशी...."ही कविता मला ह्यांच्या सोबत घालवलेल्या काही क्षणांमुळे सुचली...
ती संध्याकाळ आम्ही खूप मजेत घालवली.
मी तसा गप्पच होतो,कारण मला खरंच काही सुचत नव्हतं.
सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्यातले ते हास्य-विनोद,हे सारं काही मी टिपत होतो.
माझ्यासाठी हे सारं नवीन होतं,कारण इतका मोठा आणि इतका चांगला मित्रपरिवार मला प्रथमच लाभला.
मी स्वतःला खूप लकी समजतो की,मी ह्या मित्रपरिवाराचा एक भाग आहे...
आणि म्हणूनच त्यांच्यामुळे सुचलेल्या ह्या कवितेसोबत हा त्यांचा फोटो.....
एक संध्याकाळ अशी....,
गजबजाटात हरवलेली ।
गप्पा-टप्पांमध्ये मित्रांसोबत,
हसत-खेळत घालवलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
दुःख सारे ते विसरलेली ।
सुखद साजिर्‍या क्षणांनी,
तुडूंब भरून वाहिलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
डोळ्यांमध्ये ह्या साचलेली ।
मिटूनयेत म्हणता डोळे,
ओघळून खाली ती सांडलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
खाण्या-पिण्यात गुंतलेली ।
टेर खेचत एक-मेकांची,
हास्य-विनोदात गुंगलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
रंगात सार्‍या ह्या रंगलेली ।
रंग..संगतीत मिसळून असे हे,
चित्र देखणे ते साकारलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
सरता-सरता थांबलेली ।
पुन्हा येईल का..? अशी ती,
प्रश्‍नावर..अडून ह्या राहिलेली ।

एक संध्याकाळ अशी....,
संपूच नयेशी वाटलेली ।
संपल्यावरही मनात माझ्या,
रेंगाळत अशी ती राहिलेली ।


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

शनिवार, २३ एप्रिल, २०११

तुझी आठवण येते....


तुझी आठवण येते....
कितीही विसरावं असं म्हणालो तरी,
का... कुणास ठाऊक पण...।
तुझी आठवण येते....

एकट्यानेच चालताना वाटेवरूनही,
तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

अचानक येऊन जातो एखादा मिस कॊल ह्या मोबाईलवर,
आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

कुठून तरी एखादा आवाज कानी येतो
खोलवर जाऊन ह्या हृदयाला भिडतो,
आणि तूच पलीकडे असल्याचे तो भासवून जातो आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

धावता-धावता ही नजर कुठेतरी खिळते
कुणालातरी पाहून ती क्षणभर थांबते,
तू नसल्याची खूण पटेस्तोवर ती-त्या कुणाचा पाठलाग करत जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

नव्या-नव्या वाटसरुंशी गाठ-भेट होते
त्यांच्यात माझी नजर तुलाच शोधू पाहते,
आणि कुणात तरी मला तुझी झलक दिसून जाते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....

कुणाशी तरी बोलता-बोलता गाडी रुळावरून घसरते
जुन्याच स्टेशनांवर जाऊन ती..पुन्हा एकदा बिघडते,
गप्पा-टप्पांच्या मैफिलीत मग आठवणींची उजळणी होते आणि मग...।
का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....


हर्षद अ. प्रभुदेसाई.....

रविवार, १० एप्रिल, २०११

का केली मैत्री ही अशी...?



खरं सांगायचं तर.....
आज-काल मैत्री करायचीदेखील खुप भीती वाटते ।
कारण....
कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते ।
बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले, काही केल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देऊन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेऊन जातात ।
ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू पाहता लपत नाही ।
डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही ।
आणि मग...!
का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्‍न मला सतावत राहतो ।
पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो ।


हर्षद अ.प्रभुदेसाई....