थोडासा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल...
की...  आपलं हे आयुष्य फक्त,  
तीन कोनांच्या कोनाड्यात कोंडलेलं असतं ।
जसं भूत आणि भविष्यामध्ये,  
हे वर्तमान घुसमटत असतं ।
ह्या तिघांमध्ये चालू असतो एक अजबच खेळ...
वर्तमान धावत असतो जणू,
भविष्यास त्या गाठण्यासाठी ।
पण भूत अडवून धरतो त्यास...,  
भविष्यात त्याने ह्याला विसरू नये ह्यासाठी ।
पुढे-पुढे जरा जास्तच रंगत जातो हा खेळ...
वर्तमान जातो थकून,  
धावता-धावता त्या भाविष्याकडे ।
मग भूत येऊन म्हणतो त्यास...,  
थकला असशील तर..  येउन जा थोडावेळ माझ्याकडे ।
आयुष्यभर असाच खेळला जात असतो हा खेळ...
वर्तमान गाठतोय..  तोवर ते भविष्य,
बरंच लांब निघून गेलेलं असतं ।
आणि पाठीमागे राहिल्या त्या भूताचं मात्र,
दिवसेंदिवस वय हे... वाढतच असतं ।
थोडक्यात काय..  ह्या तिघांमधला व कधीही न संपणारा असतो हा खेळ...
कारण..  त्या भविष्यास ह्या वर्तमानाला,
काही केल्या गाठता येत नाही ।
कितीही थकला तरी वर्तमान काही,
त्याच्या मागे धावणं थांबवत नाही ।
आणि भूतदेखील वर्तमानाची पाठही कधीच,
सहजा-सहजी तरी सोडत नाही ।
ह्या सार्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का?...
हे तिघे तीन नाहीत,  हा तो एकच आहे ।
वर्तमानात असलेला तोच,  त्या भविष्यात येणारा एक वर्तमान आहे ।
आणि ओलांडून गेल्यावर भविष्यास,  मागे उरला तोच तो भूत आहे ।
म्हणजेच..  ह्या तिनही भूमिका बजावणारा,  एकमेव तो काळ आहे ।
हर्षद अ. प्रभुदेसाई.....