असे कुणीतरी यावे,
जिच्यात आपण हरवूनी जावे ।
शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला,
तिचेच दर्शन व्हावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
ओठांतले ते शब्द तिने मग,
अलगद झेलुनी घ्यावे ।
अबोल अशा ह्या डोळ्यांतले ते,
भाव समजोनी जावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
मौन धरिले तिनेच जर का,
मी अस्वस्थ असावे ।
अशा क्षणी मग बोलुनी काही,
मौन तिने सोडावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
बोल लाविले तिला कुणी तर,
घाव मलाच मिळावे ।
घाव लागता अंगी माझ्या,
आई गं... असे तिने म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
वाद जाहले अमुच्यात तरी मग,
मीच मला रोखावे ।
माझी असो वा तिची चूक ती,
मीच ‘सॊरी’ म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
हरलो जरी मी भांडणात तिच्याशी,
तिने हसत जिंकावे ।
हसू पाहता तिचे असे ते,
मी नेहमीच हरावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
हे असेच कुणीतरी आले तर मग,
स्वप्न कशास म्हणावे ।
स्वप्न उतरिले सत्यातच जर का,
सत्य ते फसवे नसावे......।
हे असे कुणीतरी यावे.....
हर्षद अ. प्रभुदेसाई...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा